आंबेडकर Live

शिक्षणाशिवाय माऱ्याच्या जागा काबीज करता येणार नाहीत

आपण राजकीय चळवळीला जितके महत्व देतो, तितकेच महत्व शिक्षण प्रसाराला दिले पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय आपल्याला माऱ्याच्या जागा काबीज करता येणार नाहीत आणि जोपर्यंत माऱ्याच्या जागा आपण काबीज करत नाही तोपर्यंत खरेखुरी सत्ता आपल्या हाती आली असे म्हणता येणार नाही.

वास्तविक शिक्षणाची तरतूद प्रांतीक सरकारानी केली पाहिजे पण असे झालेले विशेष कांही दिसत नाही. मी यापुर्वी सांगितलेच आहे पण आता क्रमप्राप्त आहे म्हणून सांगतो की, मी मात्र हिंदुस्थान सरकारकडून अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी ३ लाख रूपयांची मंजुरी मिळविली आहे. त्यामुळे आपल्या ब-याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या मिळत आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट ही की, आपलेच विद्यार्थी जास्त नापास होतात. याचे कारण मला तरी काही समजत नाही.

मी विद्यार्थी असताना या लहानशा मंडपाएवढीच आमची खोली होती. तीत आम्ही सर्व कुटुंब राहात होतो. त्यात बहिणीची दोन मुले, एक बकरी, जाते, पाटा वगैरे आणि मिणमिण जळणारा तेलाचा दिवा इतकी हलाखीची परिस्थिती असताना मी अभ्यास केला. आमच्या विद्याथ्र्यांना बोर्डीगामधून आमच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली सोय असताना त्यांनी रात्रंदिवस का अभ्यास करू नये. तुम्हाला माहिती आहे की, जो कोणी पैसा देत असतो तो त्याचा जाब विचारीत असतो.

तद्वतच हिंदुस्थान सरकार विचारील की, आम्ही अस्पृश्यांच्यासाठी जो इतका पैसा खर्च केला त्याचे त्यांनी काय चिज केले? म्हणूनच आपल्या विद्याथ्र्यांनी झटून अभ्यास केला पाहिजे. न जाणो उद्या जर काँग्रेस मिनिस्ट्री, प्रधान मंडळं आली तर हे काय करतील याचा भरवसा नाही. म्हणूच मी आताच ३ लाखांचे ५ लाख व्हावेत म्हणून खटपट करीत आहे. भाषण झाल्यावर डॉ. बाबासाहेबांच्या हस्ते अस्पृश्य विद्यार्थी बोडींगच्या इमारतीची कोनशिला बसविण्यात आली.

९ डिसेंबर १९४५ मनमाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संबोधन...