बौद्ध साहित्यात वर्णन आहे की सिद्धार्थ गौतम यांना जेव्हा बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा सर्व चराचर विश्व आनंदाने कंपित झाले. व त्यांच्या ज्ञानप्राप्तीस एकप्रकारे अधिकृत मान्यता दिली. त्या वेळी पृथ्वी थरारली. पृथ्वीवरील वृक्षांनी आणि गजराजांनी पूज्यभावाने त्यांच्या दिशेस त्यांना नमन केले. वातावरण उल्हसित झाले. आणि म्हणूनच बौद्ध परंपरेत अखिल विश्वशास्ते बुद्धांना पूर्णपणे खाली झुकून वंदन करण्याचा प्रघात पडला.
बुद्धमूर्तीला वंदन करणे म्हणजे बुद्धांप्रती आदर दाखवण्याचा, त्यांच्यापुढे नम्र होण्याचा, व त्यांच्याप्रती श्रद्धा जागविण्याचा एक विशेष विधी आहे. अनेक भिक्खूं सामूहिकपणे वंदन करताना गुडघे जमिनीवर टेकवून पायावर बसतात. मग पुढे झुकून हातावर भार घेऊन माथा भुईला टेकवितात. तेव्हा बुद्धरुपा पुढे ते नतमस्तक झालेले असतात. नाम-रूपाचे नमन बुद्धांप्रती करणे म्हणजेच त्यांच्या ज्ञानप्राप्तीला वंदन असते. त्यांच्या करुणेला वंदन असते. दुःखमुक्तीचा मार्ग दाखवून मानवजातीस उपकृत केल्याबद्दल वंदन असते.
त्याचप्रमाणे श्रमण व उपासक गुडघे भुईवर टेकवून व माथा भुईवर टेकवून तीन वेळा प्रणाम करतात. मात्र स्रियांनी वंदन करण्याचा प्रकार पूर्वेकडील बौद्ध देशात वेगळा आहे. पुरुष उपासक यांचे प्रमाणे बैठक मारून स्रियांनी बसणे तेथे योग्य मानले जात नाही. तिथे स्रियांनी पालथे बसून हात जोडून वंदन करावे असा प्रघात आहे.
संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)
Good information in my life.